
जगाच्या पाठीवर जिथे-जिथे मराठी माणूस असेल, तिथे-तिथे तो मराठी भाषा, मराठी संस्कृती, मराठी चव, सण-वार, साहित्य सगळं घेऊनच जगतो.
प्रत्येक मराठी माणसाच्या मनामध्ये लता मंगेशकर, आशा भोसले, सचिन तेंडुलकर, पु.ल.देशपांडे, भीमसेन जोशी असतातच. तीच तर ओळख आहे, मराठी असण्याची.
चारोळी घातलेल्या श्रीखंडाशिवाय गुढी पाडवा साजराच होऊ शकत नाही मराठी माणसाचा.
दिवाळीच्या आठ दिवस आधी घराघरातून सुटलेला चकलीचा खमंग वास, किल्ल्याची तयारी, नवरात्रीचा भोंडला, संक्रांतीचा तिळगुळ, गणपतीमधले उकडीचे मोदक याशिवाय सण-समारंभ साजरे करण्याचा विचारच होऊ शकत नाही.
कोल्हापूरचा पांढरा-तांबडा, साताऱ्याचा कंदी पेढा, सोलापूरची शेंगदाण्याची चटणी, मुंबईचा वडापाव, पुण्याची मिसळ, मराठवाड्याची सुशीला, विदर्भाचा वडाभात, नागपूरची संत्राबर्फी, औरंगाबादचा लाल मिरचीचा ठेचा आणि कोकणातले मासे, त्या-त्या ठिकाणची ती-ती खासियत.
वर्षानुवर्षं जिभेवर रेंगाळणाऱ्या चवी ह्या.
नाटकांशिवाय मराठी माणूस कसला? सिनेमा तर, सुरुवात करण्यापासून मराठी माणूस त्यात आहे.
मुद्दा हा, की मराठी माणूस आणि मराठीपणाशिवाय काहीच पूर्ण होऊ शकत नाही.
छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या विचाराने मराठा मेळवीला, त्याचाच आदर्श पुढे ठेवून सकल मराठीजनांनी एकत्र आणण्यासाठीचा हा प्रपंच.
मराठी माणसाच्या आवडी-निवडी आणि एक सुजाण प्रेक्षक म्हणून त्याची असलेली अभिरुची,.ध्वनी-चित्र स्वरूपात उपलब्ध करून, युट्युबद्वारे जगाच्या कानाकोपऱ्यात असलेल्या मराठी मनापर्यंत पोहोचविण्याचा हा प्रयत्न.